गणेशाचे रूप केवळ पूजेसाठी नव्हे, तर जीवनमूल्ये अंगीकारण्यासाठी.

ब्रह्माकुमारी बोपोडी केंद्रात मान्यवरांच्या उपस्थितीत गणेशोत्सव साजरा
पिंपरी प्रतिनिधी दि.१९:धार्मिक श्रद्धेसोबतच अंतर्मुखता, सकारात्मक विचार आणि राजयोग ध्यानाचा अंगीकार केल्यासच जीवन संतुलित व सुखी होऊ शकते, असा संदेश ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात आयोजित गणेशोत्सव उपक्रमातून देण्यात आला. या उत्सवानिमित्त केंद्रात दररोज विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गणेशाची आरती व विशेष आध्यात्मिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी लक्ष्मी दीदी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मुख्य वक्ता डॉ. शर्मिला बहनजी यांनी गणेशाच्या विविध रूपांमागील आध्यात्मिक रहस्य उलगडून दाखवले.
गणेशाच्या प्रतीकांमधून जीवन जगण्याचा बोध श्री गणेशाच्या प्रत्येक अवयवामागे गूढ आध्यात्मिक संदेश असल्याचे स्पष्ट करताना डॉ. शर्मिला बहनजी म्हणाल्या
विशाल मस्तक : हे दिव्य आणि स्थिर बुद्धीचे प्रतीक आहे.मोठे कान : प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे आणि संयमाने ऐकून घेण्याची वृत्ती दर्शवतात.सूक्ष्म डोळे : जीवनातील एकाग्रता आणि योगाचे महत्त्व स्पष्ट करतात.लंबोदर : जगातील कटू-गोड सर्व अनुभव पोटात सामावून घेणारे व्यापक मन असण्याचा संदेश देतात.
गणेशाकडे केवळ कर्मकांडाच्या नजरेतून न पाहता संयम, विवेक आणि सकारात्मक दृष्टिकोन दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उतरवणे हीच खरी गणेशपूजा ठरेल, असे मत त्यांनी मांडले.
राजयोग ध्यानातून आंतरिक शांतीचा मार्ग यानंतर ब्रह्माकुमारी लक्ष्मी दीदी यांनी उपस्थितांना राजयोग मेडिटेशनचा नियमित सराव करण्याचे आवाहन केले. “राजयोगामुळे मनाला स्थिरता लाभते आणि माणसाला स्वतःच्या आंतरिक सुप्त शक्तींची खरी जाणीव होते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान माउंट आबू येथील राष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार संतोष सागवेकर, संगीता पाचंगे, पूजा पंडित, सुनीता कुमारी, किसन भोसले आणि संतोष महामुनी उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकारांनी माउंट आबू येथील आपले अनुभव मांडत, अशा आध्यात्मिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजण्यास मदत होते, अशी भावना व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली.