”लेखणीत बदलाची ताकद; सामाजिक मूल्यांची जपणूक करणारे साहित्यच टिकाऊ” – श्रीकांत चौगुले

पिंपळे गुरव येथील ‘काव्यात्मा’ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
पिंपळे गुरव प्रतिनिधी २३ : “प्रत्येकजण सूर्य होऊ शकत नाही, पण मी माझा काजवा नक्कीच होऊ शकतो. समाजाचा परिघ बदलण्याची ताकद लेखणीत असते, याचे भान लेखकाने ठेवले पाहिजे. सामाजिक मूल्यांची जपणूक करणारे साहित्यच काळाच्या ओघात टिकून राहते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक श्रीकांत चौगुले यांनी केले.
पिंपळे गुरव येथे आयोजित ‘काव्यात्मा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण’ सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील गुणवंतांना सन्मानित करण्यात आले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

या सोहळ्यातउल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खालील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले:
इरान्ना निंबाळ: काव्य साधना जीवन गौरव पुरस्कार
निलेश शेंबेकर: गझलकार प्रकाश बनसोडे सन्मान पुरस्कार
उमेंद्र बिसेन: काव्य प्रतिभा सन्मान पुरस्कार
संभाजी रणसिंग: शब्दप्रभू काव्य पुरस्कार
संदिप तापकीर: काव्यात्मा सांस्कृतिक कार्य गौरव पुरस्कार
संजय मलवाड: काव्यात्मा आदर्श शिक्षक पुरस्कार
संतोष खवळे: काव्यात्मा युवा उद्योगरत्न पुरस्कार
राजू जाधव: श्रमप्रतिष्ठा पुरस्कार

यावेळी बोलताना म. भा. चव्हाण यांनी आपल्या गझलेच्या ओळी सादर करत “आज समाजात सामुदायिक निर्भयतेची गरज आहे,” असे मत व्यक्त केले. वृक्षमित्र अरुण पवार यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून देताना “घरात जेवढी माणसे आहेत, तेवढी झाडे लावली पाहिजेत,” असे आवाहन केले. व्यंगचित्रकार लहू काळे यांनी शब्द आणि रेषांच्या माध्यमातून सुदृढ समाज घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
शानदार कवी संमेलन
पुरस्कार वितरणानंतर कवी व गझलकार आप्पा कसबेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निमंत्रित कवी संमेलन पार पडले. “साहित्यिक संस्थांना नवसंजीवनी देण्यासाठी चांगल्या कामाच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहिजे,” असे आवाहन कसबेकर यांनी केले. या संमेलनात प्रमोद जगताप, प्रा. माया मुळे, राधाताई वाघमारे, सुहास घूमरे यांच्यासह सुमारे ३५ कवी-कवयित्रींनी विविध विषयांवरील कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.मान्यवरांची उपस्थिती: या कार्यक्रमास व्यंकटराव वाघमोडे, लहू काळे, संजय साळुंखे, दत्ता ठोकळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष आत्माराम हारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिमा काळे व दादाभाऊ ओव्हाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्तू ठोकळे यांनी मानले.
