देहू-आळंदी पंचक्रोशीला ‘संतभूमी’ घोषित करा; जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाची राज्य सरकारकडे मागणी

१६ किलोमीटर परिसराला अधिकृत मान्यता देण्याची विनंती; मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी दि. २३ : श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र आळंदी या १६ किलोमीटरच्या परिसराला आणि संपूर्ण पंचक्रोशीला अधिकृतपणे ‘संतभूमी’ म्हणून घोषित करून त्याची रीतसर अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’च्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे आणि संचालिका डॉ. स्वाती संजय मुळे यांनी प्रशासनाला पत्र पाठवून ही कळकळीची विनंती केली आहे.उत्तरांचल शासनाने ज्याप्रमाणे आपल्या राज्याला ‘देवभूमी’ घोषित केले आहे, त्याच धर्तीवर वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र असलेल्या देहू-आळंदी परिसराला ‘संतभूमी’ हा अधिकृत दर्जा मिळावा, यासाठी संतपीठाकडून मुख्यमंत्री महोदयांकडे सातत्याने स्मरणपत्रे देऊन पाठपुरावा केला जात आहे.
ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वशासनाला सादर केलेल्या निवेदनात या परिसराचे पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे: भागवत धर्माचा पाया आणि कळस: श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी ही दोन्ही क्षेत्रे म्हणजे भागवत धर्मरूपी मंदिराचा अनुक्रमे कळस व पाया आहेत. श्री ज्ञानोबा माउलींची समाधी आणि श्री तुकोबारायांची साधनाभूमी यांमुळे या परिसराला प्राचीन काळापासून तपोभूमी म्हणून गौरवले गेले आहे.ऐतिहासिक संदर्भ: भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, सुदुंबरे (संताजी महाराज जगनाडे यांचे गाव), चिखली आणि इंदुरी यांसारखी पवित्र ठिकाणे याच १६ किलोमीटरच्या परिघात येतात. स्कंद पुराण आणि संत एकनाथ महाराजांच्या वचनांमध्येही या परिसराचा ‘सिद्धक्षेत्र’ आणि ‘शिवपीठ’ असा उल्लेख आढळतो.
आधुनिकतेसोबतच नीतिमत्तेची गरज
पत्रात नमूद केल्यानुसार, सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड, भोसरी, तळवडे, चाकण, तळेगाव हा संपूर्ण परिसर अत्याधुनिक उद्योगांमुळे गजबजला असून येथे आर्थिक सुबत्ता आली आहे. मात्र, या भौतिक समृद्धीला संतांच्या विचारांचे अधिष्ठान असणे गरजेचे आहे. या परिसराला ‘संतभूमी’ घोषित केल्यास येथील नागरिकांमध्ये आणि भावी पिढीमध्ये समाजरचना, समता, प्रेम, अहिंसा या मानवी मूल्यांची जाणीव प्रबळ होईल आणि कोणत्याही अनैतिक व समाजविघातक प्रवृत्तींना आळा बसेल.
‘स्पिरिच्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’
(SSR) चे मॉडेलदेहू-आळंदी पंचक्रोशीतील शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आगामी काळात सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण-प्रबोधनाचे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचा संतपीठाचा मानस आहे. याद्वारे आर्थिक विकासासोबत आध्यात्मिक उन्नतीचा मेळ साधणारे ‘आध्यात्मिक सामाजिक उत्तरदायित्व’ (Spiritual Social Responsibility – SSR) चे एक अनुकरणीय मॉडेल निर्माण करता येईल, असा विश्वासही संचालकांनी व्यक्त केला आहे.
“अगणित वारकरी भाविकांच्या परमश्रद्धेचा विचार करून महाराष्ट्र शासनाने देहू-आळंदी परिसर पंचक्रोशीस ‘संतभूमी’ म्हणून रीतसर मान्यता देऊन तशी अधिकृत घोषणा लवकरात लवकर करावी, हीच सर्व वारकऱ्यांची नम्र विनंती आहे.” — ह.भ.प. राजू महाराज ढोरे & डॉ. स्वाती संजय मुळे (संचालक, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ)