पवना धरण १०० टक्के भरले

पिंपरी-चिंचवडमधील १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरी यांची मागणी
सकाळच्या वेळेत नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी
दुपारच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक, नोकरदार व महिलांचे हाल
पिंपरी-चिंचवड (विशेष प्रतिनिधी) दि. २३ : पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवर लादलेली १५ टक्के पाणी कपात महापालिका प्रशासनाने तात्काळ रद्द करावी आणि नियमित, सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप पदाधिकारी जयेश शिवराज चौधरी यांनी केली आहे.
धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणे पूर्णपणे अयोग्य आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.
सकाळच्या वेळेत पाणीपुरवठा करा सध्या शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, नोकरदार वर्ग आणि स्वयंपाकासाठी पाण्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना सकाळच्या वेळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने दैनंदिन कामांचे नियोजन कोलमडत आहे. पिंपरी कॅम्प परिसरामध्ये सध्या दुपारी १२:३० ते १:०० या वेळेत पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीचा विचार करून पाण्याचे वेळापत्रक बदलून सकाळच्या वेळेत पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
”धरण १०० टक्के भरून वाहत असताना नागरिकांना पाणी कपातीचा सामना का करावा लागत आहे? प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता १५ टक्के पाणी कपात तात्काळ मागे घ्यावी आणि शहरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा द्यावा.”— जयेश शिवराज चौधरी, सामाजिक कार्यकर्ते